Category: Aajit Pawar

  • शरद पवार कृषीमंत्री असताना एका कॉलवर कांदा निर्यात खुली व्हायची, आता आपल्याला कोणी वाली नाही : अजित पवार

    हॅलो कृषी ऑनलाईन : शरद पवार ज्यावेळी देशाचे कृषीमंत्री होते, त्यावेळी एक कॉल केली की लगेच कांदा निर्यात खुली व्हायची. आता मात्र, आपल्याला कोणी वाली नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाहीत, आपण खाणार काय? असा खडा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार हे दौंड तालुक्यातील पारगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

    सध्या दुधाला चांगला दर मिळत आहे. पण निर्मळ दूध द्या. कोणतीही भेसळ करु नका असे आवाहन देखील अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केलं. आपण अंबालिका कारखान्याची कॅपेसिटी वाढवली आहे. त्यामुळं जिथे ऊस लावायचा आहे तिथे लावा. जिथे कांडे लावायची आहे तिथे लावा. जो कारखाना चांगला भाव देईल आणि ज्याचा काटा चांगला असेल त्याला ऊस द्या असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

    सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत आला होता. तो आम्ही ताब्यात घेतला. त्यावेळी साहेब आम्हाला म्हणाले की, कशाला घेतला. आता तोच कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये असल्याचे अजित पवार म्हणाले. दौंड तालुक्यात 700 मतांनी आमचा उमेदवार पाडला. तुम्ही मला ताकद दिली की मला काम करायला हुरूप येतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

    अजित पवार म्हणाले, शेतकरी कधी संपावर जात नाहीत. त्याच्या पोटाला पिळ बसला तर अडचणी येतो. याचा विचार सरकारने करावा, असे पवार म्हणाले. नवीन सरकार आल्यापासून राज्यात रोज तीन ते चार शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाऊस पडून देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी या सरकारला वेळ नाही. ते केंद्राकडे बघतात असेही पवार म्हणाले. दौंडमध्ये ऊस जास्त आहे. भीमा पाट्स कारखाना सुरुवातीला चांगला चालला, आता तर 2 वर्ष झालं बंदच आहे. यावेळी बोलताना एकाने टाळ्या वाजवल्या, यावेळी टाळ्या काय वाजवतो कपाळ माझं असं अजित पवार म्हणाले. 21 वर्ष झालं राहुल कुल यांच्या हातात साखर कारखाना आहे. राहुल कुलला विचारा अनेकदा मी त्याला मदत केली आहे. जिल्हा बँकेने 38 कोटींची सवलत दिली आहे. ही सवलत दुसरी कोणी दिली नसती असेही अजित पवार म्हणाले.

    संदर्भ : एबीपी माझा

     

  • लंपी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई मिळवी : अजित पवार

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या त्वचारोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. पशुधनांमधील वाढता संसर्ग रोखण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

    सरकारकडून भरपाई मिळावी

    पुढे बोलताना ते म्हणाले, ‘लम्पी स्कीन’ आजाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात राज्यात दूधउत्पादनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, ते राज्याला परवडणारे नाही, असेही पवार म्हणाले. ‘लम्पी स्कीन’ आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी. पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये. या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

    दरम्यान, देशातील राजस्थान, पंजाब, हरियानासारख्या राज्यानंतर महाराष्ट्रातील पशुधनालाहीविषाणूजन्य ‘लम्पी स्कीन’चा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यांतल्या ५९ तालुक्यांत हजारो जनावरे या आजाराने ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

     

     

  • दिलासादायक ! गोगलगायीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत

    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी पावसामुळे कोवळया सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कारण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

    विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. गोगलगायींमुळे सर्वाधिक नुकसान बीड, लातूर आणि उस्मानाबाद या भागात झाले होते. या जिल्ह्यासहित अन्य काही भागातील 1 लाख 63 हजार 889 हेक्टर क्षेत्र गोगलगायीनं बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनास द्यावेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा अधिक असेल त्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व संबंधित जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारनं नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश पारित केले आहेत. यामुळं गोगलगायी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

    सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत द्या

    दरम्यान धनंजय मुंडे यांनी मागणीची दाखल घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. मात्र गोगलगायीने ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत देण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यांनी म्हंटले आहे की, हजारो हेक्टरवरील सोयाबीन क्षेत्राच्या चार-चार पेरण्या करुनही शेतकऱ्यांना गोगलगाय नियंत्रण करता आले नाही. पीकही हाती लागणार नाही. अशा बिकट परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या परिस्थितीची, आमच्या मागणीची सरकारने दखल घेतली याचे समाधान आहे. मात्र, या पेरण्यांचा खर्च किती वाया गेला असेल याचा अंदाज सरकारने लावणे गरजेचे आहे. नुकसानीची आकडेवारी व शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समोर असताना पुन्हा निकष, पंचनामे, 33 टक्के कशासाठी? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. गोगलगायीने ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत देण्यात यावी, या मागणीवर आम्ही ठाम आहोत.