Category: Grape Crop Management

  • सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये उदभवतायत समस्या ? काय कराल उपाय ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्या सद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

    १) काडी परिपक्वता

    मागील आठवड्यामध्ये बागेतील वातावरण मोकळे असल्यामुळे काही भागांत काडी कच्ची असलेल्या ठिकाणी कोरड्या वातावरणामुळे परिपक्वता होण्यास सुरुवात झाली होती. मात्र सध्या पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे काडी परिपक्वता लांबणीवर जाण्याची शक्यता असेल. या वेळी जमिनीत वाफसा असल्यास पालाशची उपलब्धता जमिनीतून आणि फवारणीच्या माध्यमातून करावी. उदा. ०-०-५० सुमारे दीड किलो प्रति एकर या प्रमाणे एक आठवडा रोज द्यावे. किंवा ०-९-४६ एक किलो या प्रमाणे आठ ते दहा दिवस द्यावे. ज्या बागेत वाफसा आलेला नाही, बोदामध्ये जास्त प्रमाणात पाणी साचलेले आहे अशा ठिकाणी फक्त फवारणीच्या माध्यमातून पूर्तता करावी. पानाची परिस्थिती पाहून फवारणीची मात्रा व संख्या कमी अधिक करावी. साधारण परिस्थितीमध्ये ०-०-५० चार ते पाच ग्रॅम किंवा ०-९-४६ तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पाच ते सहा फवारण्या आवश्यक असतील. नवीन फुटी निघत असल्यास शेंडा पिंचिंग करून घेणे फायद्याचे असेल. ढगाळ वातावरण जास्त काळ टिकून राहिल्यामुळे वेलीला आवश्यक तितका सूर्यप्रकाश मिळालेला नसेल, याकरिता काड्या एकमेकांवर येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तारेवर काड्या व्यवस्थित बांधून घ्याव्यात

    २) नुकतीच फळछाटणी झालेली बाग 

    बऱ्याचशा बागेत फळछाटणी होऊन सध्या पोंगा अवस्था दिसून येईल. या कालावधीमध्ये खरेतर वातावरण कोरडे असणे गरजेचे असते. कोरड्या वातावरणात वेलीची वाढ नियंत्रणात असते. मात्र या पोंगा अवस्थेत ज्या भागात पाऊस झाला किंवा सुरू आहे, अशा स्थितीमध्ये वेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. परिणामी वाढ जास्त प्रमाणात होताना दिसते. पोंगा अवस्थेत वेलीचा जोम जरी दिसत नसला तरी त्याचे परिणाम चार ते पाच पाने अवस्थेत लगेच दिसून येतात. वातावरणातील झालेल्या बदलामुळे वाढीचा जोम वाढून या वेळी निघत असलेला द्राक्षघडाचे रूपांतर बाळीमध्ये होण्याची समस्या दिसून येते. काही परिस्थितीत गोळीघडही तयार होताना दिसतील. ज्या बागेत मुळांच्या कक्षेत पाणी जास्त प्रमाणात साचलेले आहे, अशा बागेत निघत असलेला घड पांढरा दिसून येईल. किंवा निघालेली फूटही पिवळ्या रंगाची दिसेल. या वेळी बागेत फारसे करता येत नसले तरी वाढीचा जोम नियंत्रणात ठेवण्यासाठी पालाशयुक्त खतांचा वापर जमिनीतून तसेच फवारणीच्या माध्यमातून करता येईल. या सोबत संजीवकांची फवारणीही तितकीच महत्त्वाची असेल. या वेळी घड जिरण्याची समस्या रोखण्यासाठी ६ बीए १० पीपीएम प्रमाणे करता येईल. बऱ्याचदा बागायतदार पोंगा अवस्था सुरू होण्यापूर्वीपासूनच ६ बीए व पालाशची फवारणी सुरू करतात. यावेळी डोळा फुगलेला असून केवळ कापसलेला असतो, त्यामुळे आपण करत असलेल्या फवारणीचे परिणाम मिळत नाहीत. पोंग्यातून एक ते दीड पान जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत फवारणीचे परिणाम मिळत नाहीत. यासाठी केलेली फवारणी पानाने शोषून डोळा फुटण्याची गरज असते. तेव्हा बागेतील परिस्थिती पाहून डोळ्यातून पान बाहेर निघाल्यानंतरच फवारणी करावी. पालाशची फवारणी करताना त्याचे प्रमाण फार कमी ठेवावे. उदा. अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी वाढीच्या या अवस्थेत पुरेसे होईल. खताच्या फवारणीची मात्रा वाढवण्यापेक्षा फवारण्यांची संख्या वाढविल्यास परिणाम चांगले मिळतील. या पूर्वी बागेत दोन ओळींच्या मध्य भागात चारी घेतलेली असल्यास बोद लवकर मोकळे होतील. वाफसा असलेल्या परिस्थितीत जमिनीतून खतांचा वापर (मॅग्नेशिअम आणि फेरस) करता येईल.

  • सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेत उद्भवतिये घड कुजेची समस्या ? काय कराल उपाय ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्यासद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आजच्या लेखात आपण द्राक्ष घड कुजण्याच्या समस्येविषयी जाणून घेऊया…

    द्राक्ष घड कुजण्याची समस्या

    कधी होते कुजेची समस्या ?

    दोन ते तीन आठवड्यांपूर्वी फळछाटणी केलेल्या बागेत या वेळी काडीवर काडीवर निघालेल्या फुटींची संख्या जास्त असेल, तसेच फुटींची वाढही जास्त झालेली असेल. एका काडीवर साधारणतः चार ते पाच डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग केले जाते. या वेळी साधारणतः सात ते आठ पानांची अवस्था असेल. म्हणजेच प्रत्येक काडीवर ३५ ते ४० पाने असतील. वेलीवर असलेल्या काड्याची संख्या लक्षात घेता या वेळी प्री ब्लूम अवस्थेमध्ये दाट कॅनॉपी तयार झालेली आहे. कोरडे वातावरण असल्यास घडावर फारसे विपरीत परिणाम होणार नाहीत. मात्र सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे वाढलेल्या आर्द्रतेमुळे एकतर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढतो. किंवा कुजेची समस्या निर्माण होते.

    काय करावे उपाय ?

    १) प्री ब्लूम अवस्थेमध्ये घडात अजून देठ तयार झालेले नसले तरी घडावर पाणी साचून राहिल्यास तो घड कुजण्याची शक्यता वाढते. यासाठी वेळीच फेलफूट काढणे गरजेचे होते. या हंगामात सतत होत असलेल्या पावसाचा विचार करता काडीवर फेलफुटी शक्य तितक्या लवकर काढून घ्याव्यात.

    २)दरवर्षीच्या तुलनेत फुटींची संख्या कमी ठेवावी. कॅनॉपीमध्ये आर्द्रता कमी करण्याच्या दृष्टीने हे करणे अत्यंत गरजेचे असेल.

    ३) ज्या बागेत वाफसा परिस्थिती अजून आलेली नाही, अशा भागात काही काळ पाऊस सुरू असल्यास डाऊनी मिल्ड्यू, करपा किंवा जिवाणूजन्य करपा यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल. फळछाटणीनंतर १४ ते १७ दिवसांच्या कालावधीत फेलफुटी काढण्याला प्राधान्य द्यावे.

    ४)सतत झालेल्या पावसामुळे बोदामधून पाणी व त्यासोबत उपलब्ध अन्नद्रव्येही वाहून गेली असतील. अशा स्थितीमध्ये द्राक्ष वेल अशक्त होऊ शकते. वेलीला ताण बसतो. यामुळे कुजेची समस्याही वाढताना दिसते. यावर मात करण्यासाठी वेलीला सशक्त करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. झिंक, बोरॉन ची फवारणी प्रत्येकी अर्धा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घ्यावी. पालाश दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे एक ते दोन फवारण्या करून घ्याव्यात.

    ५)पाने पिवळी असलेल्या परिस्थिती वाढीचा जोम कमी असल्यास नत्रयुक्त किंवा नत्र स्फुरदयुक्त खतांची फवारणी करता येईल.
    फेलफुटी काढताना कोवळ्या काडीवर जखमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस सुरू असलेल्या परिस्थितीत या जखमेमुळे कुजेची किंवा रोगाची समस्या येण्याची शक्यता असेल. तेव्हा फेलफूट काढल्यानंतर लगेच बुरशीनाशकांची फवारणी करून घ्यावी.