Category: Kolhapur

  • After Amul, Gokul Increased Milk Rates

    हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन दिवाळी सण तोंडावर आला असताना आता दुधाच्या दरामध्ये (Milk Rate) वाढ करण्यात आली आहे. आधी अमूल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र आता गोकुळने देखील म्हशीच्या दूध विक्री दरात वाढ केली आहे. याबाबतची माहिती एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र समूहाकडून देण्यात आली आहे. गोकुळ ने केलेली ही दुध दरवाढ शुक्रवार पासून लागू करण्यात येणार आहे.

    किती रुपयांची वाढ ?

    वृत्तानुसार, गोकुळकडून म्हशीच्या दूध विक्री दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दूध दरवाढ मुंबई आणि पुणे शहराकरता लागू असेल. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात एक लिटर दुधाची किंमत (Milk Rate) ६६ रुपयांवरून ६९ रुपये झाली आहे. तर, अर्धा लिटर दुधाची किंमत ३३ रुपयांवरून ३५ रुपये झाली आहे. यापूर्वी दीड वर्षांत गोकुळने सहा वेळा दूध दरात वाढ केली आहे.

    याबाबत बोलताना गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले की, “रशिया-युक्रेन संघर्ष आणि अनेक दूध उत्पादक देशात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन घटले असून, दूध पावडरची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या दूध संकलन कमी असल्याने पावडरची मागणी पुरवू शकत नाही. दूध संकलन वाढवण्यासाठी खरेदी दरात (Milk Rate) वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून दूध विक्री दरात वाढ करण्यात आली आहे,” असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.

    दोन दिवसांपूर्वी अमूलने केली होती दरवाढ (Milk Rate)

    अमूल दूधने फुल क्रीमसह म्हशीच्या दुधात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे फुल क्रीम दुधाची किंमत लिटरमागे ६१ रुपयांवरून ६३ रुपये होणार आहे. गायीचे दूध आता ५३ रुपये प्रतिलिटरपासून ५५ रुपये प्रतिलिटर होणार आहे. यासह गोल्ड, म्हशीच्या दूध दरातही लीटरमागे २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ गुजरात वगळता देशातील सर्वच राज्यांत लागू असेल.

  • राज्यातील ‘हा’ साखर कारखाना देणार एकरकमी FRP

    हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापुरातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी हंगामासाठी कारखान्याच्या परंपरेनुसार एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व श्रीदत्त साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

    यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सभासदांच्या विश्वासास पात्र राहून आणि कामगारांच्या पाठबळावर दत्त साखर कारखान्याने चौफेर प्रगती साधली आहे. यावर्षी कारखान्याकडे पुरेसा ऊस उपलब्ध होणार असून यंदाचा गळीत हंगामात जादा क्षमतेने गाळप करण्याचा मानस आहे. ते म्हणाले, की केंद्र शासनाने हंगामापूर्वी साखर निर्यातीबाबतचे धोरण जाहीर करणे आवश्यक आहे,वार्षिक सभेत कारखान्याचा शेअर १० हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करण्याच्या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली.

    पुढे बोलताना ते म्हणाले, साखरेला केंद्र शासनाने प्रति क्विंटल तीन हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत ठरवावी. कारखाना कार्यक्षेत्रातील १९ गावांमधील क्षारमुक्त प्रकल्प राबविण्यात आला असून यामध्ये तीन हजार एकर जमीन टिकाऊ झाली आहे. क्षारमुक्त प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना एकरी २४ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. ऊर्जांकूर प्रकल्प हा लवकरच कर्जमुक्त होणार असून तो कारखान्याच्या मालकीचा झाल्यानंतर ऊस उत्पादक सभासदांना त्याचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. त्याचबरोबर या सभेत सभासदांनी विचारलेल्या लेखी स्वरूपातील प्रश्नांना व्यवस्थापनाने उत्तरे दिली. व्हाइस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलराव यादव यांच्यासह संचालक उपस्थित होते.