Category: Lumpy

  • Lumpy : ‘लम्‍पी’ त्वचारोगामुळे राज्यात 271 जनावरांचा मृत्यू

    हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये होणाऱ्या लंपी या त्वचारोगाचा (Lumpy) मोठ्या प्रमाणात फैलाव राज्यात होताना दिसत आहे. दिनांक १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यापैकी २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर या रोगातून ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. याबाबतची माहिती माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

    २५ लाख लस मात्रा उपलब्ध

    सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘लम्पी स्कीन (Lumpy) आजाराने राज्यभरात सोमवार अखेर २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजार २९१ जनावरे आजारमुक्त झाली आहेत,’’ अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. तर ‘‘तातडीच्या लसीकरणासाठी २५ लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. या विविध जिल्ह्यांमधील प्रादर्भावाचे प्रमाण पाहून वितरित केल्या जातील,’’ असेही त्यांनी सांगितले.

    २७१ पशुधन दगावले

    सिंह म्हणाले, ‘‘ राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १ हजार १०८ गावांत ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २७१ पशुधन मृत झाले आहे. तर तातडीच्या लसीकरणासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ४९ लाख ८३ लाख लशींच्या मात्रा उपलब्ध आहेत. यापैकी बाधित क्षेत्राच्या ५ कि.मी. परिघातील १ हजार १०८ गावांतील १६ लाख ४५ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.’’

    मुंबई नियंत्रित क्षेत्र जाहीर

    ‘लम्पी स्कीन’च्या (Lumpy) प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

     लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • महत्वाची बातमी ! ऊस वाहतुकीसाठी बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून यावर्षीच्या ऑक्टोबर मध्ये सुरु होणाऱ्या गाळप हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण करणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भांत बैल घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या याद्या सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

    राज्यात ऊस गाळपासाठी हार्वेस्टर, वाहतुकीकरिता ट्रॉली यांचा वापर वाढला असला तरी अद्यापही बैलगाडी द्वारे उसाची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. ‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये दिसून आल्यामुळे सर्वच साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक व शेती अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. आपापल्या साखर कारखान्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून बैलगाडीकरीता बैल घेऊन येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या नावांची गावनिहाय यादी अद्ययावत करा. ही यादी तातडीने संबंधित मजूर ज्या जिल्ह्यातून येणार आहेत त्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त पाठवा,” अशा सूचना आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत.

    याबाबत बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की , “राज्याचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. त्यासाठी नेहमीप्रमाणे हजारो बैल विविध कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतील. ‘लम्पी स्कीन’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जनावराचे आरोग्यविषयक नियोजन महत्त्वाचे राहील. त्यामुळे कारखान्यांकडे बैल घेऊन येणाऱ्या मजुरांची यादी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना आम्ही राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. यामुळे लम्पी स्कीन रोग प्रतिबंधक लसीकरण काटेकोरपणे राबविण्यास मदत मिळेल.”

    १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार यंदाचा गाळप हंगाम

    दरम्यान यंदाचा गाळप हंगाम हा येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याची माहिती आहे . याबाबतची घोषणा मुक्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (१९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर देण्यात आली. त्यामुळे गाळप हंगाम सुरु होण्याच्या तसेच लंपीच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • सावधान ! लंपी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यावर होणार कठोर कारवाई

    हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लंपीरोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.

    सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, “लंपी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) इ. चा वापर करून जनजागृती करावी अशा सूचना पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी-अधिकारी यांना दिल्या.

    खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

    लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लंपी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासीता छात्र (ईंटर्नीज) यांना प्रति लसमात्रा रु.3 प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. सर्व खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविणेचे श्री.सिंह यांनी आवाहन केले आहे.

    ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी

    शासकीय पशुवैद्यकांनी तसेच खाजगी पशुवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. पशुपालकांनी अशी तक्रार विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ वर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी अशा सूचनाही यावेळी त्यांनी यावेळी दिल्या.

  • प्रेरणादायी ! 1 हजार पशुधनाचे सरपंचाकडून लम्पी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    जिल्ह्यातील पाथरी तालूक्यात येणाऱ्या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पुढाकार घेतल्यानंतर १ हजार पशुधनाचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे . विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन ही लसीकरण मोहीम दोन्ही गावच्या सरपंचांनी मोफत राबविली आहे.

    तालूक्यातील वाघाळा गावचे सरपंच बंटी घुंबरे व सिमुरगव्हाण चे सरपंच विष्णु उगले यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत स्वतःच्या गावातील पशुधनाला लम्पी आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागशी समन्वय साधत शनिवार १७ सटेंबर रोजी मोफत लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन केले होते . यामध्ये वाघाळा गावात ७०० तर सिमुरगव्हाण येथील ३०० पशुधनाचे लसीकरण करण्यात आले . दरम्यान राज्य सरकार येत्या काही दिवसात लम्पी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन लसीकरण मोहीम हाती घेणार आहे त्याआधी सामाजीक दायित्वातून पशुधनाची दोन्ही सरपंचानी घेतलेली काळजी तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

    वाघाळा येथे लसीकरण यशस्वीतेसाठी सरपंच बंटी घुंबरे यांच्यासह अभिजीत घुंबरे , महेश घुंबरे , पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे , संभाजी काकडे , सखाराम बोबडे , सुरेश होके यांनी तर सिमुरगव्हाण येथे उपसरपंच सुनील नायकल , ग्राम पंचायत सदस्य रामजी उगले,गणेश उगले, विकास कदम,रामेश्वर उगले,चांगदेव उगले, विष्णु रामभाऊ उगले,सेवक मारोती गवारे,ग्राम रोजगार सेवक बळीराम उगले,दिलीप उगले,ओमप्रकाश उगले,माऊली उगले , डॉ . पि. एल.जाधव , डॉ .चोरे ,डॉ .रवी विरकर , डॉ . रिजवान अन्सारी , डॉ . गजानन बनगर यांनी परिश्रम घेतले .

  • पशुधनाच्या औषधांचा खर्च शासन करणार, दिवसाला एक लाख जनावरांना लसीकरण : विखे पाटील

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान हरियाणा नंतर आता राज्यातही लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यात या आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. या साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले असून राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लंपी रोगग्रस्त पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येणार अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते.

    राज्यासाठी एका आठवड्यात 50 लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी असे देखील विखे पाटील यावेळी म्हणाले. खासगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुशंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रुपये प्रमाणे मानधन सुरु करावं. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देवून लंपी चर्म आजाराबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

    एका दिवसात एक लाख लसीकरण

    पुढे बोलताना ते म्हणाले, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आल्याने देशातील अन्य राज्यांच्या तूलनेत या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. आजारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन पाच किलोमीटर परिसरातील पशुधनासोबतच राज्यभरातील पशुधनाचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असून, येत्या काळात हा वेग अधीक वाढेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    किती मिळणार मदत ?

    –मृत जनावरांसाठी गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासरु 16 हजार याप्रमाणे मदत देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दल आणि राज्य पातळीवरील हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे.
    — जिल्हा पातळीवर देखील हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
    — म्हशींवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत नसल्याने म्हशींच्या संदर्भातील केंद्र सरकारची मंजुरी घेऊन बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात येईल.

  • लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश




    लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांना होणाऱ्या लंपी या साथीच्या रोगाचा फैलाव राज्यात वेगाने होत आहे. महाराष्ट्रात या रोगाचा होणार फैलाव बघता प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाबाबत मोठी घोषणा केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासोबत, लम्पी स्कीन आजारांमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

    टास्क फोर्सची स्थापना

    राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांमध्ये या रोगाचा फैलाव झाला आहे. राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आील आहे. लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे टास्क फोर्स करणार आहे.

    जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर

    दरम्यान, औरंगाबादमधील विनोद पाटील यांनी लम्पी स्कीन आजाराचा धोका ओळखून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. याचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी काल (१६) क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे. त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे.

     

    error: Content is protected !!





  • Establishment of Coordinating Cell in Ministry




    lumpy : Establishment of Coordinating Cell in Ministry











































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंबी रोगाविषयी संपर्क साधण्यासाठी मंत्रालयात समन्वय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. (02 2 – 28 45 13 2) या दूरध्वनी क्रमांकावर पशुपालकांनी संपर्क साधावा असावाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता यांनी केला आहे.

    राज्यात लंपी चर्म रोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनावर औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. तथापि काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच शेतकरी पशु पालकांना संपर्क साधता यावा व क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयात रूम नंबर 520 पाचवा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरू करण्यात आला आहे.

    राज्यातील चर्म रोगाचा वेळोवेळी आढावा घेणे, या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेला मार्गदर्शन करणे, उपाययोजनांबाबत राज्य शासनाला शिफारस करणे, इत्यादींसाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यालयाचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञ व्यक्ती आणि शास्त्रज्ञांचा समावेश देखील करण्यात आला आहे.

    error: Content is protected !!





  • Lumpy : एप्रिलमध्ये नोंदवलेली पहिली केस, आतापर्यंत 67 हजार गुरे मरण पावली, जाणून घ्या 10 मुद्दे

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशात नवी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनानंतर लंपी (Lumpy) त्वचेचा आजार देशात मोठी महामारी बनण्याच्या मार्गावर आहे. या आजारामुळे देशात मोठ्या प्रमाणात गुरांच्या मृत्यूची प्रकरणे समोर येत आहेत.वास्तविक हा विषाणू Poxviridae कुटुंबातील Capripoxvirus वंशाचा आहे. 22 एप्रिल रोजी या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून या आजाराने 67 हजार गुरांचा मृत्यू झाला आहे. या आजाराशी संबंधित अपडेट्स 10 पॉइंट्समध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

    १)लम्पी स्किन डिसीज आतापर्यंत देशातील १२ हून अधिक राज्यांमध्ये पसरला आहे. ज्या अंतर्गत 16 लाखांहून अधिक गुरांना या विषाणूची लागण झाली आहे. हा विषाणू प्रामुख्याने गायींना आपल्या कवेत घेत आहे.

    २)लम्पी त्वचा रोग रक्त खाणाऱ्या कीटकांमुळे पसरतो. यामध्ये डास आणि माशांच्या काही प्रजातींचा समावेश आहे. त्याच वेळी, दूषित खाद्य आणि पाण्यामुळे लम्पी त्वचा रोग देखील पसरू शकतो.

    ३)लम्पी स्किन डिसीजची मुख्य लक्षणे म्हणजे ताप आणि त्वचेवर गुठळ्या येणे. काहीवेळा त्वचेच्या गुठळ्या खूप वेदनादायक होतात, त्यातून रक्त बाहेर येऊ लागते. रोगाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, गुरेढोरे देखील मरू शकतात.

    ४)ज्या गुरांना एकदाही या विषाणूची झळ बसली नाही, अशा गुरांसाठी लम्पी स्किन डिसीज धोकादायक असल्याचे सांगितले जाते. खरं तर हा नवीन व्हायरस नाही. यापूर्वीही हा विषाणू गुरांना आपल्या कवेत घेत आहे. पण, यावेळी त्याचा प्रसार खूप वेगाने झाला आहे.

    ५)22 एप्रिल रोजी गुजरातमधील कच्छमधून लम्पी स्किन डिसीजचा पहिला केस समोर आला होता. यानंतर राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये त्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

    ६)गुरांच्या त्वचेच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी, गुरांना शासनाकडून लसीकरण केले जात आहे. ज्या अंतर्गत गुरांना पॉक्स  (Lumpy) देण्यात येत आहे. लम्पी स्किन डिसीजमध्ये ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा केंद्राने केला आहे.

    ७)लम्पी स्किन डिसीजचा सामना करण्यासाठी स्वदेशी लस ‘Lumpi-ProVacInd’ देखील विकसित केली जात आहे. मात्र, या लसीचा व्यावहारिक वापर अद्याप सुरू झालेला नाही.

    ८)देशातील दोन कंपन्या लम्पी स्किन डिसीजसाठी स्वदेशी लस बनवत आहेत. 2 ते 3 महिन्यांत या लसी तयार होतील अशी अपेक्षा आहे. ते वापरले जाऊ शकते.

    ९)लम्पी स्किन डिसीजचा प्रसार पाहता राजस्थानसह इतर अनेक जिल्ह्यांनी याला महामारी घोषित करण्याची मागणी केली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे.

    १०)लम्पी स्किन (Lumpy) डिसीजचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुरू आहेत. त्याच वेळी, त्याचा प्रसार पाहता, ते मानवांसाठी देखील धोकादायक असेल असे बोलले जात . हे पाहता या विषाणूपासून मानवाला कोणताही धोका नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

  • केंद्र सरकारने लंपी त्वचा रोगाला महामारी घोषित करावे, सीएम गेहलोत यांचे मोदींना पत्र

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांना गायींमध्ये पसरणाऱ्या लंपी त्वचेच्या आजाराला महामारी म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, महामारी घोषित केल्याने या रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि पशुधन वाचवण्यासाठी वैद्यकीय आणि वाहतूक यासारख्या सुविधा मजबूत करण्यात मदत होईल.

    मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजस्थान व्यतिरिक्त 13 राज्यांमध्ये हा आजार पसरला आहे. मात्र, या आजाराचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे.राजस्थान सरकार हा आजार रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संदर्भात आवश्यकतेनुसार जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय पशू वाहतूक, गुरांचा हाट, पशु मेळा यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय राज्यासाठी पुरेशा लसी मिळण्याची मागणी केली.

    दरम्यान राजस्थान राज्यात 16.22 लाख लसी उपलब्ध आहेत, त्यापैकी 12.32 लाख गोवंशीय प्राण्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच 11.59 लाख जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. रोगग्रस्त भागात रोग सर्वेक्षण, रोग निदान व उपचारासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त वाहने भाड्याने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • Lumpy : सरकारने तातडीने सर्व पशुधनाचा विमा उतरवावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी (Lumpy) हा त्वचा रोगाचा आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये हा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. या आधारावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. येत्या 10 दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करून द्यावा, खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचा केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने विमा उतरवण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

    राज्य सरकारकडून पशुधनाचा विमा उतरवावा

    राजस्थान हरियाणा नंतर आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लंपी (Lumpy) रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. अशातच लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. तातडीची उपाययोजना म्हणून येत्या दहा दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करुन द्यावा. खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचे केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने विमा उतरवावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

    पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांचा तुटवडा, अनेक ठिकाणी पदे रिक्त

    गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये वेळेत योग्य उपचार न झाल्यानं लम्पी (Lumpy) या आजारानं मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. सदर आजारातील देशी जनावरांच्या मृत होण्याची टक्केवारीचे प्रमाण जवळपास 10 टक्क्यांपर्यंत गेले आहे. मात्र, संबंधित राज्य सरकारकडून अपयश लपवण्यासाठी चुकीची आकडेवारी दर्शवली जात आहे. या आजारामुळेच देशामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण होवू लागला आहे. राज्य सरकारने लसीकरणास जरी सुरुवात केली असली तरी राज्यात पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांची पदे भरलेली नसल्याने डॅाक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे.

    लम्पी स्कीन (Lumpy) आजाराचा प्रामुख्याने देशी जनावरामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. महाराष्ट्रात खिलार, साहिवाल, गीर, देवणी, कोकण गीर, रेड सिंधी कांक्रेट या देशी जनावरांची संख्या जास्त आहे. बाजारांमध्ये जनावरांच्या किंमती गगनाला भिडल्या असून, या आजारात जनावरे दगावल्यास पशुपालकांना हा मोठा फटका बसणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. ज्याप्रमाणं कोरोना काळात कमी हप्त्यामध्ये जनतेला विमा उपलब्ध करुन दिला त्याचप्रमाणे राज्यातील सर्वंच जनावारांचा येत्या दहा दिवसात तातडीने विमा उतरवण्यात यावा. जेणेकरुन एखादे जनावर यामध्ये दगावल्यास संबंधित पशुपालकास होणाऱ्या नुकसानीचे अर्थसहाय्य मिळून त्या कुटुंबास आधार मिळेल, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.