Category: Lumpy

  • लम्पीची दहशत ! प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    हॅलो कृषी ऑनलाईन : परराज्यात दहशत माजविणाऱ्या लम्पी या रोजगाची महाराष्ट्रात देखील प्रकरणे वाढली आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील पशुधनाला या रोगाची लागण झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये दिसून येत आहे. म्हणूनच खबरदारी म्हणून बीड आणि अहदनगरच्या जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनं सतर्क झाले असून . जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरुर कासार आणि पाटोदा या तालुक्यातील जनावरांचे बाजार पुढचे काही काळ बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. बीड जिल्ह्यातल्या धसवाडी येथे काही जनावरांमध्ये लंपी स्कीन आजार आढळून आल्याने जिल्हाभरातील इतर जनावरांना त्याची लागण होऊ नये म्हणून अंबाजोगाई, परळी, आष्टी आणि शिरुर तालुक्यासह पाटोदा येथील जनावरांचे बाजार भरवण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. यापूर्वी देखील या आजाराचा संसर्ग अनेक जनावरांना झाला होता. त्यामुळं हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याधिकाऱ्यांनी देखील जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    अंबाजोगाई तालुक्यातल्या धसवाडीमध्ये काही जनावरांना या लम्पी आजाराची लागण झाली असून, गायी आणि बैलांमध्ये या आजाराचा संक्रमण जास्त प्रमाणात होत आहे. या आजारामुळं जनावरांना तीव्र ताप येतो तर तहान भूक आणि रवंत करण्याची क्षमता देखील कमी होते. जनावरांमध्ये अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असा आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

     

  • पुणे जिल्ह्यानंतर ‘या’ जिल्ह्यातील 109 जनावरांना ‘लंपी’ ची लागण

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान, गुजरात राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या लंपी या जनावरांतील त्वचा रोगाने राज्यात सुद्धा हात पाय पसरायला सुरुवाट केली आहे. सुरवातीला पुण्यातील जुन्नर येथील पशुधनाला या रोगाची बाधा झाली होती. आता अकोला जिल्ह्यात देखील या रोगाने शिरकाव केला आहे.

    अकोल्यातील मौजे निपाणा (ता. अकोला), तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यात जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १०९ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून, त्वचेचे खरड व रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

    दरम्यान, निपाणा येथील एका जनावरामध्ये ‘लम्पी’ या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवाल तपासणीनंतर सकारात्मक आला आहे. या रोगाचा प्रसार अन्य जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार संसर्गकेंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

    आजाराची माहिती देण्यासाठी टोल फ्री नंबर जारी

    या रोगाचा फैलाव वाढल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज झाली असून पशुपालकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आजारासंबंधी माहिती देण्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला आहे. यावर पशुपालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

     

  • लंपी रोगापासून आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान गुजरात मध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘लंपी’ या जनावरांना होणाऱ्या रोगाने महाराष्ट्रातही एंट्री केली आहे. आजच्या लेखात आपण या रोगापासून आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी ? याची माहिती घेऊया. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी इथल्या तज्ञ व्यक्तींनी दिली आहे.

    –लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग गायवर्गीय व म्हैसवर्गीय पशूधनात दिसून येत आहे.
    –हा साथीचा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार मूख्यत्वे रक्त पिपासू चावणऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यामूळे होतो.
    –याच्या व्यवस्थापनासाठी रोग बाधीत पशुधन निरोगी पशुधनापासून विलगीकरण करावे अथवा त्यांना एकत्रित चरावयास सोडू नये.
    –रोगबाधीत पशुधनाची ने आण बंद करावी.
    — तसेच साथीच्या काळात गावातून/परिसरातून गोठयास भेटी देणाऱ्याची संख्या मर्यादीत करावी.
    — बाधीत पशुधनाची सुश्रुषा करणाऱ्य पशुवैद्यक डॉक्टरांनी विशिष्ट पोशाख परिधान करावा व सुश्रूषेनंतर हात अल्कोहोत मिश्रीत सॅनीटायझरने धूवून टाकावेत तसेच पादत्राने व पोशाख, गरम पाण्याने निर्जंतूक करून घ्यावा.
    –बाधीत पशुधनाच्या संपर्कामध्ये आलेले वाहन व परिसर तसेच ईतर साहीत्य निर्जंतूक करावे. रोग नियंत्रणासाठी रक्त पिपासू चावणाऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यांचे निर्मुलन करावे.
    –पशुधन व परिसरावरती रासायनिक/वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.

    आजाराचा प्रसार

    –बाधित जनावराच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्राव, दूध, लाळ, वीर्य, इ. माध्यमामार्फत हा आजार निरोगी जनावरात पसरतो.
    –संसर्गजन्य असल्याने या विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे.
    –साधारणतः ४ ते १४ दिवस हा कालावधी या आजाराचा संक्रमण कालावधी असतो. संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो. त्यानंतर शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होते. त्यामुळे जनावराचे विविध स्राव, जसे डोळ्यातील पाणी, नाकातील स्राव, लाळ, इत्यादींमधून हा विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन इतर जनावरांना या आजाराचा संसर्ग होते.
    –त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३५ दिवस जिवंत राहू शकतो. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोगाद्वारेही याचा संसर्ग होऊ शकते.

    आजाराची लक्षणे

    –हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
    –सुरुवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेन्द्रिय इ. भागात येतात.
    –बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात.
    –निमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा होऊ शकते.
    –अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.

    उपचार

    –हा आजार विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही. परंतु विषाणूजन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरास प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने जिवाणू प्रतिबंधक औषधी म्हणजे प्रतिजैविके देणे आवश्यक आहे.
    –त्यासोबत ताप कमी करणारी औषधे, प्रतिकार शक्तिवर्धक जीवनसत्त्व अ व ई तसेच त्वचेवरील व्रणांसाठी मलमाचा वापर करणे गरजेचे आहे.
    –वेदनाशामक व अँटि हिस्टॅमिनिक औषधांचाही आवश्यकतेप्रमाणे वापर करावा.
    –जनावरास मऊ व हिरवा चारा व तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
    –तोंडातील व्रणास २ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन तोंडात बोरोग्लीसरीन लावावे. लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते.

  • Lumpy : सावधान ! महाराष्ट्रातही ‘लम्पी’ चा शिरकाव; काय घ्याल काळजी ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : गुजरात, राजस्थानात धुमाकूळ घालणाऱ्या ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या रोगाने महाराष्ट्रातही एंट्री केली आहे. पुण्यात पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कोपरे मांडवे (ता. जुन्नर) येथील ८ गायी आणि बैलांना लम्पी स्कीन रोगाची लागण झाली आहे. यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून, लगतच्या असलेल्या अकोले (जि. नगर) येथे देखील बाधित पशुधन होते. यामुळे आता पशुधनाची देखील तपासणी आणि तातडीचे उपचार सुरू करण्यात आले आहे.

    ८ जनावरे बाधित

    या बाबतची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘नगर जिल्हा सीमेजवळील जुन्नर तालुक्यातील मांडवे गावात लम्पी त्वचा रोग आढळला. नगरमधील अकोले तालुका यापूर्वी बाधित होता. या तालुक्यातून प्रादुर्भाव झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून, कोपरे मांडवे (ता. जुन्नर) येथील ८ जनावरे बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आजाराचा फैलाव वाढू नये यासाठी परिसरातील एक किलोमीटरच्या परिघातील सर्व पशुधनांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर परिसरातील जनावरांचे बाजार बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

    या आजाराचा फैलाव वाढू नये यासाठी पशुधनाचा बाजार बंद करणे, वाहतूक रोखणे आणि लसीकरण यासारखे खबरदारीच्या उपाययोजनांचे टप्पे सुरू केले आहेत. या प्रादुर्भावामुळे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद बाधित गावांचा दौरा करणार आहेत.

    आजाराची लक्षणे

    हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. सुरुवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेन्द्रिय इ. भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात. निमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा होऊ शकते.
    अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.

    प्रतिबंध

    1)निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत.
    2)प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावरांवर तसेच गोठ्यात डास, माश्या, गोचीड इ.चे प्रमाण कमी करण्यासाठी यासाठीच्या आवश्यक औषधांची फवारणी करावी.
    3)गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
    4)साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी.
    5)जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी.
    बाधित क्षेत्रात गाई म्हशींची विक्री, पशू बाजार इ. बंद करावे.
    6)बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करत असताना किंवा रोग नमुने गोळा करत असताना पीपीई किटचा वापर करावा. हात धुऊन घ्यावेत. तपासणीनंतर सर्व साहित्य निर्जंतुक करावे.
    7)बाधित परिसरात स्वच्छता करावी. निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून परिसर निर्जंतुक करावा. याकरिता १ टक्का फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराइट याचा वापर करावा.