Category: Sangali

  • सांगलीत पिकतोय महागडा काळा तांदूळ ; आसाममधून बियाणे मागवून जिल्ह्यात केला पहिलाच प्रयोग…

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सांगली

    सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पुनवत: सागाव येथील प्रगतिशील शेतकरी शशिकांत रंगराव पाटील यांनी शेतात ‘ब्लॅक राईस’ जातीच्या भाताचे पीक घेतले आहे. या भाताचे बियाणे त्यांनी आसाममधून मागविले आहे. एक वेगळा प्रयोग करत काळा भात पीक घेण्याचा हा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. मात्र परिसरात या भात पिकाचा विषय चांगलाच रंगत आहे..

    शिराळा तालुक्यात खास करून भात शेती केली जाते. शशिकांत पाटील सात एकर शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. यावर्षीच्या खरीप हंगामात पारंपरिक भात बियाणांपेक्षा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी मित्रांच्या साहाय्याने आसाममधून ब्लॅक राईस हे २०० ते २५० रुपये किलो असलेले महागडे बियाणे मागविले.

    ढोलेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात त्यांनी २३ मे रोजी या भाताची पेरणी केली. पेरणीतून उगवलेल्या रोपांतून त्यांनी बाजूच्या दुसऱ्या क्षेत्रात जुलै महिन्यात रोपलागण केली.पेरणी केलेल्या पिकापेक्षा लागणीचे पीक अधिक चांगले आहे. सध्या हे भात परिपक्व होत आलेले आहे.या भाताची लाबी आणि आतील तांदूळ काळ्या रंगाचा आहे. साधारण सात गुंठ्यांत घेतलेले हे पीक इतर भात पिकापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ चार-साडेचार फूट उंचीचे झाले आहे. या पिकासाठी त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला आहे.

    शिराळा तालुक्यातील पोषक वातावरणात हा भाताचा प्रयोग यशस्वी ठरत असून यातून चांगले उत्पन्न मिळेल असा पाटील यांना विश्वास आहे.परिसरात या भात पिकाचा विषय चांगलाच रंगत आहे. हा तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. हा तांदूळ शिजण्यास वेळ लागतो.पण पौष्टिक असतो.या तांदळाची किंमत ही जास्त आहे.उत्पादक शेतकऱ्याला ही चांगला नफा मिळवून देते.

  • मागणीनुसार एकरकमी एफआरपी देऊ | Hello Krushi

    हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली

    आम्ही एकरकमी ‘एफआरपी’बाबत यापूर्वीही स्पष्ट केले आहे; मात्र एफआरपी तीन हप्त्यांत द्यावी, अशी ‘क्रांती’च्या सभासदांचीच मागणी आहे. जे शेतकरी एकरकमी एफआरपीची मागणी करतील, त्यांना एकरकमी देऊ, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार लाड बोलत होते.

    यावेळी बोलताना आमदार लाड म्हणाले, की गेल्या वर्षी केवळ ३५ शेतकऱ्यांनीच एकरकमी एफआरपी नेली. राज्यातील एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा कारखाना ‘क्रांती’ आहे. यावर्षी एफआरपीपेक्षा ८० रुपये जास्त रक्कम शेतकऱ्यांना देत आहोत.यातील ४० रुपये भागविकास निधी व उर्वरित ४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दीपावलीपूर्व जमा करत आहोत. कारखान्याची २९७५ रुपये एफआरपी असताना या वेळी शेतकऱ्यांना ३०५५ रुपये देत आहोत. आजवर कारखान्याने शेतकऱ्यांना जशी हवी तशी एफआरपी दिली आहे.

    यापूर्वी बहुतांश ऊस उत्पादकांनी तीन हप्त्यांत एफआरपीची रक्कम द्यावी, असे सांगितले, त्यानुसार दिली आहे. आज रोजी १४ हजार एकर ऊस नोंद आहे. यातून आपण १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. शासनाने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३६०० रुपये करावा. कारखान्‍याने शेतकऱ्यांची, बँकांची देणी व कर्मचाऱ्यांच्या बोनससह पगार व तोडणी वाहतूक कमिशन डिपॉझिट अशी सर्व देणी वेळेत दिली आहेत.

    यावेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, उद्योजक उदय लाड, क्रांती दूध संघाचे किरण लाड, दिलीप लाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य शरद लाड, जयवंत कुंभार, निवृत्ती पाटील, प्रशांत चौगुले यांच्यासह कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्‍हाणे, सचिव अप्‍पासाहेब कोरे उपस्थित होते. दिलीप पार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले.