‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीच्या निकषात बदल…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून या रोगाला अटकाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या ठरावीक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई दिली जात होती. आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून जितकी जनावरे ‘लम्पी स्कीन’ने दगावतील तितक्या जनावरांना नुकसानभरपाई मिळणार आहे. पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग यांनी मंगळवारी (ता. ४) जुन्या आदेशात बदल करून नवीन आदेश काढला आहे.

लम्‍पीची साथ आल्यानंतर मृत पावलेल्या जनावरांबाबत संबंधित पशुपालकांना अर्थसाह्य देण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र जे पशुपालक हे अल्‍प भूधारक, अत्यल्‍प भूधारक आहेत, त्‍यांनाच हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हा लाभ केवळ एका शेतकऱ्या‍साठी तीन जनावरांच्या मृत्यूपर्यंतच होता. या शासन निर्णयात आता बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार, सर्व शेतकरी व पशुपालकांना या निर्णयाचा लाभ होईल. तसेच जनावरांच्या संख्येवर घातलेली मर्यादाही उठवण्याचा महत्त्‍व‍पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

किती मिळणार रक्कम ?

गाय किंवा म्‍हैस लम्‍पी स्कीनने मृत पावल्यास संबंधित पशुपालकास ३० हजार रुपये, ओढकाम करणारी जनावरे, जसे की बैल मृत पावला तर २५ हजार व वासरू असेल, तर १६ हजार रुपये मदत देण्यात येईल. जितकी जनावरे लम्पी स्कीनने दगावतील तितक्या सर्व जनावरांसाठी मिळणार मदत
अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे पशुधन मृत पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसाह्य मिळणार आहे. केवळ ‘लम्पी स्कीन’ने मृत झालेल्या जनावरांनाच्या पशुपालकांनाच मिळणार भरपाई मिळणार आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *